हिंदू विवाह अधिनियम १९५५
कलम १२ :
शून्यकरणीय विवाह :
१) कोणताही विवाह - मग तो अधिनियमाच्या प्रारंभापूर्वी लावलेला असो वा नंतर लावलेला असो - पुढीलपैकी कोणत्याही कारणावरुन शून्यकरणीय असेल व शून्यतेच्या हुकूमनाम्याद्वारे तो रद्दबातल करता येईल, ती कारणे अशी :-
१.(क) उत्तरवादीच्या मैथुनाक्षमतेमुळे विवाहाची परिपूर्ती झालेली नाही;) किंवा
ख) त्या विवाहामुळे कलम ५ च्या खंड (दोन) मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या शर्तीचे व्यतिक्रमण झाले आहे ; किंवा
ग) विनंतीअर्जदाराची संमती, किंवा जेथे २.(बालविवाह निरोध (विशोधन) अधिनियम १९७८ याच्या प्रारंभाच्या लगतपूर्वी कलम ५ जसे होते त्यानुसार) विनंतीअर्जदाराच्या विवाहार्थ पालकाची संमती आवश्यक होती तेथे, अशा पालकाची संमती बळजबरीने ३.(किंवा संस्कारांच्या स्वरुपाबाबत अथवा उत्तरवादीसंबंधीची कोणतीही महत्वाची वस्तुस्थिती वा परिस्थिती याबाबत लबाडी करुन) मिळविण्यात आली होती; किंवा
घ) विवाहाच्या वेळी उत्तरवादी स्त्री ही विनंतीअर्जदाराहून अन्य व्यक्तीपासून गरोदर होती.
२) पोटकलम (१) मध्ये काहीही अंतर्भूत असले तरी, विवाह रद्दबातल करण्यासाठी केलेला कोणताही विनंतीअर्ज -
क) तो पोटकलम (१) च्या खंड (ग) मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या कारणावरुन केला असेल त्याबाबतीत, जर -
एक) बळजबरीचा प्रभाव थांबल्यानंतर किंवा, प्रकरणपरत्वे, लबाडी नजरेस आल्या नंतर एक वर्षाहून अधिक काळाने विनंतीअर्ज सादर करण्यात आला असेल तर; किंवा
दोन) बळजबरीचा प्रभाव थांबल्यानंतर किंवा, प्रकरणपरत्वे, लबाडी नजरेस आल्यानंतर, विनंतीअर्जदार त्याच्या किंवा तिच्या पूर्ण संमतीने विवाहतील दुसऱ्या पक्षाबरोबर पती किंवा पत्नी म्हणून राहिला / राहिली असेल तर,
विाचरार्थ स्वीकारला जाणार नाही.
ख) तो पोटकलम (१) च्या खंड (घ) मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या कारणावरुन केला असेल त्या बाबतीत, -
एक) विवाहाच्या वेळी विनंतीअर्जदार अभिकथित तथ्यांबाबत अनभिज्ञ होता;
दोन) या अधिनियमाच्या प्रारंभापूर्वी विधिपूर्वक लावलेल्या विवाहाच्या बाबतीत अशा प्रारंभापाूसन एका वर्षाच्या आत आणि अशा प्रारंभानंतर विधिपूर्वक लावलेल्या विवाहाच्या बाबतीत विवाहच्या दिनांकापासून एक वर्षाच्या आत कार्यवाही मांडण्यात आली आहे; आणि
तीन) ४.(उक्त कारण) अस्तित्वात असल्याचे विनंतीअर्जदाराच्या नजरेस आल्यापासून विनंतीअर्जदाराच्या संमतीने वैवाहिक संभोग घडून आलेला नाही,
अशी न्यायालयाची खात्री झाल्याखेरीज विचारार्थ स्वीकारला जाणार नाही.
----------
१. १९७६ चा अधिनियम ६८ कलम ६ द्वारे मूळ खंड (क) ऐवजी घातले.
२. १९७८ चा अधिनियम २ कलम ६ व अनुसूची यांद्वारे मूळ मजकुराऐवजी घातले.
३. १९७६ चा अधिनियम ६८ कलम ६ द्वारे किंवा लबाडीने याऐवजी घातले.
४. १९७६ चा अधिनियम ६८ कलम ६ द्वारे हुकूमनाम्यास आधारभूत अशी कारणे या मजकुराऐवजी घातले.
#HinduMarriageAct1955Marathi #HinduMarriageActMarathisection12 #हिंदूविवाहअधिनियम१९५५कलम१२
INSTALL IOS / Iphone App
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.